चंदनाचे हात, पायही चंदन!
सध्याचा काळच असा की, आपल्याच नेत्यांचा जनतेला काडीचा भरोसा वाटत नाही. पांढर्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहे, ज्याच्यावर राखलेल्या तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव गणपतराव देशमुख. त्यांच्या वयाला 85 वर्षे पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं…हा 84 वर्षांचा तरुण माणूस गेली 10 निवडणुका सतत आमदार म्हणून निवडून येतोय. त्याने राजकारणातले कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते. मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. ते आहेत, सोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. गणपतरावांच्या राजकीय वाटचालीत गेल्या 50 वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास सापडतो.
गणपतरावांचा जन्म 10 ऑगस्ट, 1927 रोजी मोहोळ तालुक्यातल्या पेनूर या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. ते पुण्यातून एल.एल.बी. झाले. गणपतरावांची खरी जडणघडण झाली ती पुण्यातच. शिकत असतानाच ते शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी सभेत काम करू लागले. स्वातंत्र्य नुकतच मिळालं होतं. पण सुराज्य आलं नव्हतं. शेतकरी, कामगारांचं राज्य यावं यासाठी हे तरुण कामाला लागले. भाई शंकरराव मोरे, कॉम्रेड मालिनीताई तुळपुळे आणि कॉम्रेड भागवत या तरुणांचे मार्गदर्शक होते. या तरुणांच्या फळीत गणपतराव होते. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, र. के. खाडीलकर, भाऊसाहेब शिरोळे हे शेकापचे ज्येष्ठ नेते त्यावेळी गाजत होते. गणपतराव त्यांच्या विचाराने भारावून गेले होते. संघटनेत पडेल ते काम करू लागले. शेकापने चालवलेले `जनसत्ता’ साप्ताहिक विकू लागले. शंकरराव मोरे यांचा सहवास गणपतरावांना तरुणपणीच लाभला. त्यातून त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्त्व घडत गेलं. 1947मध्ये साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून पंढरपूरला प्राणांतिक उपोषण सुरू केलं. तेव्हा गणपतराव विद्यार्थी होते. या उपोषणाने महाराष्ट्राला सामाजिक समतेचा मंत्र दिला. त्याचा मोठा परिणाम गणपतरावांच्या समतावादी व्यक्तिमत्वावर झाला.
1956 मध्ये एल.एल.बी. झाल्यानंतर सांगोले तालुक्यातील गौडवाडी येथील नातेवाईक यशवंतराव देशमुख यांच्याकडे गेले होते. यावेळी यशवंतराव आणि इतर गावकर्यांनी घरचाच वकील म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना मदत करण्याचा आग्रह धरला. जवळच्या बुद्धेहाळ मध्यम पाटबंधारे प्रकल्पात शेतकर्यांची सुमारे 1600 एकर जमीन आणि 250 घरं पाण्याखाली गेली होती. त्यांनी भरपाई मात्र मिळाली नव्हती. हा प्रश्न हाती घेऊन गणपतरावांनी शेतकर्यांना
न्याय मिळवून दिला. या यशानं गणपतरावांमधल्या चळवळय़ा, संघटक युवक नेत्याला आत्मविश्वास दिला.
यामुळे पुढे गौडवाडी – सोमेवाडी परिसर गणपतरावांचा बालेकिल्ला झाला. शेकापक्षाला या भागात मोठा पाठिंबा मिळाला.
1958 ते 65 पर्यंत गणपतरावांनी सांगोला कोर्टात वकिली व्यवसाय केला. 1962 साल गणपतरावांच्या आयुष्यात वेगळं ठरलं. त्यांना शेकापक्षाचं आमदारकीचं तिकीट मिळालं. ते निवडून आले. सांगोले तालुक्याचे आमदार झाले.
आमदार झाल्यानंतर गणपतरावांनी लोकांशी संवाद साधण्याला महत्त्व दिलं. त्यांची कामं करण्याला, प्रश्न सोडवण्याला सर्वाधिक महत्त्व दिलं. सतत लोकांमध्ये राहून, त्यांची पीडा दूर करण्याचा त्यांनी वसाच घेतला. न उतता न मातता त्यांनी हा वसा पुढे नेला. म्हणूनच ते दहा वेळा सांगोल्याचा आमदार बनण्याचा विक्रम करू शकले. आमदारपद स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नाही तर जनता जनार्दनासाठी आहे हे त्यांनी जाणलं. आपलं तन, मन, धन, सेवा, वेळ, शील, हृदय असं सगळं जनता जनार्दनाला अर्पण केलं. जनतेनंही त्यांना आपलं मानलं. 1978-80 मध्ये त्यांनी पुलोदच्या सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून काम केलं. त्यावेळी 127 कोटी रुपयांची शेतकर्यांची बंडींगची कर्जे माफ करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 1999-2002 मध्ये ते पणनमंत्री होते. तेव्हा त्यांनी शेतकर्यांचं हित बघितलं.
बदलत्या युगासोबत सांगोला शहरानं कात टाकली आहे. शहरात चांगल्या शैक्षणिक संस्था, विश्वासार्ह बँका, समृद्ध व्यापारी पेठा, विविध उद्योग आलेत. अर्थात याचं श्रेय सांगोल्यातले लोक देतात गणपतरावांच्या दूरदर्शी नेतृत्वाला. दुष्काळी माणदेशाचा भाग असलेला सांगोला तालुका अलिकडं डाळिंबाच्या उत्पादनासाठी नावाजला. इथली डाळिंब देशातल्या अन्य प्रांतात जातात. परदेशातही पाठवली जातात. त्यामुळे मुबलक पैसा या भागात येत आहे. दुष्काळाला कंटाळलेली इथली माणसं पूर्वी पोटापाण्यासाठी शहराकडे जात होती. आता हे स्थलांतर थांबलंय. गणपतरावांनी पाणी, शेती, रोजगार, शेतमालाला योग्य भाव अशा प्रश्नांवर मोर्चे, आंदोलन, परिषदा अशा विविध चळवळी गणपतरावांनी केल्या. 1979-80 मध्ये सांगोला शेतकरी सूतगिरणी स्थापन केली. टेंभू, म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी मिळावे म्हणून प्रयत्न केले. विधानसभेत आणि रस्त्यावर संघर्ष केला. पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पंढरपूरच्या भीमा नदीतील पाणी 32 किलोमीटर अंतरावरून लोखंडी पाईप टाकून सांगोला शहरात आणलं. तालुक्यातील गावांनाही 86 कोटी रुपये खर्चून पिण्याचं पाणी पुरवलं. महिलांसाठी स्वतंत्र महिला सूतगिरणी उभारली. शिक्षण संस्था सुरू केली. या संस्थेचं कॉलेज नावाजलेलं आहे. सूतगिरणीने महिला आणि शेतकर्यांना रोजगार मिळवून दिला. आज दोन्ही सूतगिरण्या प्रगतीपथावर आहेत. या गिरण्यांना राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेत.
राज्यात सहकाराला वाईट दिवस आलेत. मोठ मोठय़ा संस्था, कारखाने, गिरण्या, बँका डबघाईस आल्यात. त्याला सहकारातल्या अपत्रवृत्ती जबाबदार आहेत. या अपप्रवृत्ती गणपतरावांनी सांगोल्यात येऊ दिल्या नाहीत. म्हणून सांगोल्यातल्या संस्था, गिरण्या प्रगतीपथावर आहेत.
एवढं काम केलं पण गणपतराव त्याविषयी फारसं बोलत नाहीत.
गणपतरावांचं काम फक्त सांगोल्यापुरतंच नाही. दुष्काळ, पाणी, शेती, वीज, महागाई, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, शेतीमालाचे भाव अशा प्रश्नांवर त्यांनी राज्याला दिशा देणारं काम केलं आहे.
विधानसभेत सभेचे नियम, विधानसभेने केलेले कायदे, भारतीय घटना आणि संसदीय कामकाज पद्धतीवर गणपतरावांचे प्रभुत्व आहे. नवे आमदार त्यांच्याकडून म्हणूनच सतत सल्ला घेत असतात.
पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं सांगोल्याला गेलो होतो. गणपतरावांच्या ऑफिसमध्ये साध्या लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या. गावातले लोक त्यांना आबा म्हणतात. आबा आणि आबांचं हे घर पूर्वीपासून असंच, साधं असल्याचं गावकरी सांगतात.
या वयातही आबा सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतात. रात्री उशिरापर्यंत ते सुरू असतं. सर्व अधिकारी त्यांना मानतात. त्यांनी सांगितलेलं काम झटपट करतात. सांगोल्यात तर सरकार दरबारी लोकांची कामं अडवली जात नाहीत.
डोंगराएवढं काम करून हा मनुष्य `मी केलं.’ असं म्हणत नाही. सतत आम्ही केलं, आमच्या पक्षानं केलं असं म्हणतो. सभा संपल्यानंतर त्यांच्यासोबत सूतगिरणीतल्या गेस्ट हाऊसवर गेलो. भव्य परिसर. जवळ आलेल्या कर्मचार्याला त्यांनी सांगितलं, `हे पत्रकार आहेत. यांची इथं रहायची व्यवस्था करायची. चांगली रुम द्या. गेस्ट हाऊसमध्ये एवढय़ा उशिरा जेवण शिल्लक नसणार. हे शंभर रुपये घ्या. जवळपासच्या हॉटेलवर यांना जेऊ घाला. या शंभर रुपयांत आताचं जेवण उद्याचा नाश्ता होईल. उद्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था मी करीन.’
मला इतर सहकार सम्राटांचा बडेजाव, त्यांचं वैभव आठवलं. हा नेता असा. तळं राखलं पण पाणी चाखल्याचे आरोप त्यांच्यावर कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात गणपतरावांसारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. त्याना पाहून मला तुकोबारायांचा अभंग आठवतोय.
चंदनाचे हात, पायही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग
दीपा नाही पाठी पोटी अंधकार
सर्वांगे साकर अवघी गोड !
परिसा नाही हीन कोणी अंग
दीपा नाही पाठी पोटी अंधकार
सर्वांगे साकर अवघी गोड !
(मनोविकास प्रकाशनतर्फे प्रकाशित होणार्या पुस्तकातून साभार)
Comments
Post a Comment